Rain Alert : राज्यातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोकणात सक्रिय झालेला मान्सून आता मुंबईतही दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने मुंबईसह परिसरासाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रविवारी सकाळपासून मुंबईतील अनेक भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे.
मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत वातावरणात बदल होत असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ आणि २६ जूनदरम्यान मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला काहीसा विलंब झाला असला तरी वातावरणातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, विदर्भात उष्णतेचा प्रभाव कायम असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामानासोबत वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागांत ढगाळ वातावरण, उकाडा आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल होत असून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत येत्या काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेकडे लागले आहे.


