Maharashtra Weather Update : गेल्या दोन आठवड्यांपासून मंदावलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार सरींसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामानासोबत वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.
याशिवाय सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांतही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल बनत असून येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


