बेकेनहॅम (इंग्लंड): कर्णधार हमजा शेखच्या लढाऊ शतकाच्या बळावर इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने पहिल्या युवा कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवत सामना ड्रॉ केला.
भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने ६३ षटकांत ७ गडी गमावून २७० धावा केल्या आणि भारताला २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवू दिली नाही. शेखने मंगळवारी येथे १४० चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. त्याला बेन मेयेसची महत्त्वाची साथ मिळाली, ज्याने ८२ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याच्याशिवाय यष्टिरक्षक फलंदाज थॉमस रीव्हने ३५ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले. १४व्या षटकात इंग्लंडचा स्कोअर ३ बाद ६२ असा होता; पण त्यानंतर भारत दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला.
शेख आणि मेयेस यांच्यासोबत उपयुक्त भागीदारी करून इंग्लंडने चांगले पुनरागमन केले. खेळ संपण्यास एक तास शिल्लक असताना, भारताने सलग २ षटकांत धावबाद करून आपल्या विजयाच्या आशा उंचावल्या. प्रथम त्यांनी शेखला बाद केले आणि नंतर पुढच्या षटकात एकांश सिंगला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. पण राल्फी अल्बर्ट (३७ चेंडूंत नाबाद ९) आणि जॅक होम (३६ चेंडूंत नाबाद ७) यांनी दबावाखाली आपली हिंमत दाखवली आणि सामना अनिर्णित राखला. भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ५४० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ४३९ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात २४८ धावा करत इंग्लंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने यापूर्वी ५ सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली होती.


