मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे, तर काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.
काय आहे पावसाचा अंदाज?
– कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि अत्यंत अतिवृष्टीची शक्यता.
– मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस, 40-50 किमी/तास वेगाने वादळी वारे, वीज आणि गडगडाट अपेक्षित.
– विदर्भात पुढील पाच दिवस हाय अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता.
मच्छीमारांसाठी इशारा
कोकण किनारपट्टीवर 16 ते 20 ऑगस्टदरम्यान 50-60 किमी/तास वेगाने वादळी वारे आणि खवळलेला समुद्र अपेक्षित आहे. मच्छीमारांना या काळात समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
नागरिकांना पूरापासून सावध राहण्याच्या सूचना
रायगडमधील अंबा नदीने धोक्याची पातळी, तर कुंडलिका, रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागरिकांना पूरापासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सचेत ॲपद्वारे अलर्ट पाठवले जात असून, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयीन आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत असून, संपर्कासाठी 022-22027990, 022-22794229, 022-22023039 आणि 9321587143 हे क्रमांक उपलब्ध आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगडसह अनेक जिल्ह्यांत 19 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गटारपट्ट्यांपासून दूर राहावे आणि अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.


