मुंबई: महाराष्ट्र सरकारने निराधार, वृद्ध आणि अपंग व्यक्तींना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत 1500 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली. जरी याबाबतचा अधिकृत सरकारी आदेश अद्याप प्राप्त झालेला नसला तरी ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे हजारो निराधार, अपंग, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फक्त बुलढाणा जिल्ह्यातील 2.35 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होईल. नागपूर जिल्ह्यातही विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2,35,305 लाभार्थी असून त्यापैकी 1,81,908 जण राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ घेतात.
पुण्यातील पहिला गँगवॉर अन् आंदेकर टोळीचा रक्तरंजित चार दशकांचा इतिहास; वाचा
या वाढीमुळे लाभार्थ्यांचे दैनंदिन जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी सांगितले की, श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक मदत 2500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र सरकारचा अधिकृत आदेश अद्याप प्रतीक्षेत आहे.
अर्ज कुठे करावा?
- तहसीलदार कार्यालय
- जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखा
- आपले सरकार पोर्टल (ऑनलाईन अर्ज)
संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजना ही राज्य सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. यामध्ये निराधार, वृद्ध, अनाथ, अपंग आणि इतर वंचित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. समाजातील दुर्बल घटकांना आधार देऊन त्यांच्या जगण्याची गुणवत्ता सुधारावी हा यामागील उद्देश आहे.


