जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जळगाव शहरात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध समस्या कर्जमाफी, हमीभाव, कापूस खरेदी आणि पाणीपुरवठा सोडवण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आक्रमक आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वार फोडून आत शिरत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले आणि घोषणाबाजी केली.
यावेळी डोक्यावर काळी पट्टी बांधलेले कडू यांनी मंत्र्यांना ‘नालायक’ आणि ‘गुलाम’ म्हणून थेट हल्ला चढवला. “नेपाळसारखे नाही करणार, तुमची घरं पेटवणार नाही, पण घरापर्यंत येऊ!” असा इशारा देत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मोर्च्यात माजी खासदार उन्मेश पाटील आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. या घटनेमुळे जळगावात काही वेळ तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे.
द्वार फोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले
मोर्चा जळगाव शहरातील विविध भागांतून निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रमक झाले आणि मुख्य द्वार उघडून आत शिरले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात घुसून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. “शेतकऱ्यांच्या समस्या ऐका, नाहीतर मोर्चा पुढे जाईल!” असे ओरडत आंदोलकांनी तणाव वाढवला. कडू यांनी डोक्यावर काळी पट्टी बांधून प्रतीकात्मक निषेध केला, ज्यामुळे त्यांचा पारा चढला असल्याचे दिसले.
पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळ गोंधळ उडाला. शेवटी, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकण्याचे आश्वासन देऊन मोर्चा मागे घेण्यास सांगितले. व्हिडिओ फुटेजनुसार, कडू यांनी द्वार फोडत आत जाण्याचा थरारक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या मोर्चाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या समस्या कापूस खरेदीवरील विलंब, कर्जमाफी, हमीभावाची अंमलबजावणी आणि पाणीटंचाई – सोडवणे हा होता. कडू यांनी सांगितले की, “जिल्ह्यात चार मंत्री आहेत, पण कुणीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. आपल्यालाच आवाज उठवावा लागेल.”
गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा
मोर्चादरम्यान कडू यांनी भाषणात सत्ताधारी मंत्र्यांवर थेट हल्ला चढवला. “शेतकरी अडचणीत असताना कुणालाही वाटू नये की, आपण किमान आवाज तरी करायला हवा. इतके नालायक आमचे नेते आहेत,” असा शेरा मारत त्यांनी मंत्र्यांना ‘नालायक’ म्हटले. भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर “ते भाजपचे संकटमोचक झाले, पण शेतकऱ्यांचे होऊ शकले नाहीत,” अशी टीका केली. मराठवाड्यातील पाणी आणि शेती समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
महसूल मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही बोचरी टीका केली. “हा जोरात आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही. नाही वरून तर खाल्लच काढ!” असा सल्ला देत त्यांनी पाटील यांना ‘गुलाम’ म्हटले. कडू यांनी सांगितले की, “सगळे मंत्री गुलाम झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करायचा, पण खरेदी होऊ द्यायची नाही. तुम्ही लुटले नसते तर शेतकऱ्यांचे कर्ज फेडले असते, बापाचेही कर्ज फेडले असते.


