Eknath Shinde On Maharashtra Flood: महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. उच्चस्तरीय पथक सोलापूर आणि धाराशिवसह मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहे. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री सोलापूरला जातील, मी धाराशिवला भेट देईन आणि अजित दादा देखील दौऱ्यावर असतील. राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकार त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे. दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई दिली जाईल.’
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, मराठवाड्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (NDRF) थेट संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. सरकारची जबाबदारी आहे की, तातडीने मदत पोहोचवावी. यापूर्वीही महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि हे काम पुढेही सुरू राहील, असेही आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
1,339 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर –
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी 1,339 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून मदत वितरित केली जात आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.


