मुंबई: मराठवाड्यातील भीषण पुरस्थितीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. पूरग्रस्तांना मदतवाटप करताना काही नेत्यांनी भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. लोक मरत असताना काही जण मात्र आपले फोटो व दाढी दाखवत मदतवाटप करतात. अशा परिस्थितीत स्वतःचा प्रचार करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, अशी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
शेतीचे प्रचंड नुकसान
पूरामुळे मराठवाड्यात तब्बल 70 लाख एकरांवरील पिके वाहून गेली असून 36 लाख शेतकरी थेट संकटात सापडले आहेत. घरे, जनावरे, जमीन सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. ही केवळ एक हंगामी आपत्ती नाही. पुढील पिढ्यांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होणार आहे. शेतीच्या दृष्टीने मराठवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तिजोरीतून मदत द्या –
शिंदे गटावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, ‘जर त्यांच्याकडे इतका पैसा असेल तर सरकारच्या मदतीवर आपले फोटो लावण्याऐवजी समृद्धी आणि शक्तिपीठ महामार्गातील ठेकेदारांकडून घेतलेले पैसे तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत द्यावी.’ राज्यावर आधीच 9 ते 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा स्थितीत सरकारने फक्त 225 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावरून राऊत यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे 10 हजार कोटींच्या तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. सरकारकडे आपत्कालीन नियोजन नाही. दुष्काळ आणि अवकाळी पावसावेळी दिलेली आश्वासनेही पूर्ण झालेली नाहीत, कारण तिजोरीत पैसेच नाहीत, असंही राऊत यांनी यावेळी नमूद केलं.
विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा
राज्यात सध्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याची टीकाही राऊत यांनी केली. जनतेचा आवाज दाबण्यासाठी जाणीवपूर्वक ही पोकळी ठेवण्यात आली आहे. भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची नावे सुचवूनही त्यांची नियुक्ती होत नाही. हा निर्णय लोकशाही आणि महाराष्ट्राच्या जनतेविरोधात आहे, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.


