मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा करण्यात आली. यामुळे दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली आहे, त्यांना प्रति हेक्टरी 3.47 लाख रुपये मदत मिळेल. तसेच, नुकसानग्रस्त पिके, जनावरे आणि घरांसाठीही स्वतंत्र आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वात मोठे शेतकरी मदत पॅकेज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
हेही वाचा – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत गाड्या फोडल्या
शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?
- जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख मदत
- रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 अनुदान
- हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई – 27,000 प्रति हेक्टरी
- बागायती शेती नुकसान भरपाई – 32,000 प्रति हेक्टरी
- कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000 मदत
- दुधाळ जनावरांना 37,000 पर्यंत सहाय्य
- गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30,000 अनुदान
- कुकुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 मदत
- घरं व झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी 50,000 मदत
- डोंगरी भागातील घरांना अतिरिक्त 10,000 सहाय्य
- विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर थोडा ताण सहन करावा लागेल. पण सरकार शेतकऱ्यांच्या सोबत ठामपणे उभं आहे. अतिवृष्टीचं प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक होतं, म्हणूनच मदत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चाही झाली असून केंद्र सरकारकडून विमा प्रक्रियेत गती आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निर्णयामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे.


