बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव भागवत अंकुश राठोड (रा. गेवराई तालुका, बीड) असे आहे. याप्रकरणी त्याची आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, भागवतला त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड हे सतत मानसिक त्रास देत होते. या सततच्या छळामुळे तो खोल नैराश्यात गेला होता.
दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी भागवत राठोडने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाच्या निधनानंतर काही दिवसांनी दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, भागवतने नेमके कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले याचा शोध घेतला जात आहे.
सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे महिला आत्महत्या करतात, अशा बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र या प्रकरणात एका पतीनेच सासरच्या छळाला कंटाळून जीव देण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समाजात अशा घटना रोखण्यासाठी मानसिक आधार आणि संवेदनशीलतेची गरज असल्याची चर्चा सुरु आहे.


