Maharashtra Rain Alert : मे महिन्याच्या सुरुवातीला कृत्तिका नक्षत्रापासून पावसाने हजेरी लावली असली तरी आता राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहील.
राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 32 अंशांहून अधिक आहे, तर रत्नागिरीत 35.5 अंशांसह सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. सांताक्रुझ, जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि अमरावतीतही तापमान 34 अंशांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे परतीचे वातावरण अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून माघारी फिरला असून, मंगळवारी पूर्वोत्तर राज्ये आणि ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागांतूनही मॉन्सून परतला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी सकाळच्या वेळी थंडीची चाहूल लागू लागली आहे.


