Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद होण्याच्या चर्चांनी लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण केली होती. मात्र, राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या बैठकीत बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. ती बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट, परिस्थिती अनुकूल झाली तर आर्थिक मदत वाढवण्याचाही विचार सरकार करत आहे.
झिरवळ यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार जोपर्यंत राज्याच्या नेतृत्वात आहेत, तोपर्यंत ही योजना सुरूच राहील. त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्षम नेतृत्वाचेही कौतुक केले. नरहरी झिरवळ यांनी पुढे सांगितले की, सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. जर परिस्थिती सुधारली, तर महिलांना मिळणारी रक्कम 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार केला जाईल.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठी अपडेट; अदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
डहाणूतील या सभेत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे अनेक कार्यकर्ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रचार करत, महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना सरकारची प्रामाणिक भूमिका असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहेन योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. अलीकडेच या योजनेच्या पात्रतेसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना जीवनातील आर्थिक स्थैर्याचे साधन ठरली आहे. झिरवळ यांच्या विधानानंतर या योजनेवरील अनिश्चिततेचा प्रश्न संपुष्टात आला आहे. तथापी, या योजनेमुळे भविष्यात लाभार्थ्यांना आणखी मोठा दिलासा मिळू शकतो.


