Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट दिली असून, सर्व पात्र महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे. विशेषतः पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी ही मुदत १५ दिवसांनी वाढवली जाणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे मेळाव्यात घोषणा
काल (१३ ऑक्टोबरला) ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पदाधिकारी मेळाव्यात तटकरे यांनी उपस्थिती लावली. मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबतची नवीन माहिती दिली. “सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज सुमारे ४ ते ५ लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत आहे.
आतापर्यंत १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त महिलांची पूर्ण ई-केवायसी झाली असून, अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची ९०% प्रक्रिया पूर्ण झाली आहे,” असा अहवाल तटकरे यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, “पूरग्रस्त भागातील बहिणींसाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून देऊ. लवकरच सर्व तांत्रिक समस्या दूर होणार आहेत.”
तटकरे यांनी सोशल मीडियावरही याबाबत माहिती शेअर केली असून, सर्व लाभार्थींना लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “ई-केवायसी ही प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची आहे. तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सर्व्हर अपग्रेड सुरू आहे. बहिणींना आश्वस्त करते की, लवकरच ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल.”
ई-केवायसी का बंधनकारक?
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दरवर्षी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. यामुळे लाभार्थींची ओळख आणि पात्रता पडताळली जाईल, जेणेकरून योजना योग्य महिलांपर्यंतच पोहोचेल. दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा, महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक सहाय्य रक्कम थांबू शकते.


