मुंबई : मुंबईकरांसाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. आता मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि धावपळ वाचणार असून, प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.
कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी
मुंबई शहर आणि उपनगरातील सहा मुद्रांक कार्यालयांमध्ये आता मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र यासह सर्व प्रकारच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी करता येईल. यापूर्वी नागरिकांना त्यांच्या क्षेत्रातील विशिष्ट कार्यालयातच नोंदणी करावी लागत होती, परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. यासंदर्भातील शासनाचे राजपत्रही जारी करण्यात आले आहे.
नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार
या सुधारणेमुळे मुंबईकरांना दस्त नोंदणीसाठी विशिष्ट कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि धावपळ वाचेल, तसेच प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान होईल. हा निर्णय मुंबईतील रहिवासी, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल.
जागा मोजणीचा कालावधी 30 दिवसांत
महसूल विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जागा मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांत मोजणी पूर्ण केली जाईल. यासाठी खासगी परवानाधारक भूमापक नेमण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या भूमापकांच्या मोजणीला सीटी सर्वे ऑफिसर आणि डेप्युटी एसएलआर प्रमाणित करतील. यामुळे मोजणी प्रक्रियेला गती मिळेल आणि राज्यातील साडेतीन कोटी लोकांच्या मोजणीच्या गरजा पूर्ण होतील.


