मंगळवेढा: येत्या 26 ऑक्टोबरला मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने या कार्यक्रमाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.
हा भव्य सोहळा भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, मनोज जरांगे पाटील यांनाही अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे आणि त्यांनी ते स्विकारले आहे, असे अवताडे यांनी सांगितले. या सोहळ्याला राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्त्व
या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असे की, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि जरांगे एका स्टेजवर येत आहेत. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही या सोहळ्यास उपस्थित राहण्यास होकार दिला आहे, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान फडणवीस हे जरांगे यांच्या उपोषणस्थळी गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी टाळण्यासाठी सरकारने त्या वेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघे एकाच मंचावर येणार असल्याने नवे समीकरण निर्माण होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे आराध्य दैवत असल्याने या सोहळ्याला सर्वच पक्षांतील नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात फडणवीस आणि जरांगे खरोखरच एकत्र मंचावर दिसतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


