Islampur Name Change: दीर्घकाळ प्रलंबित असलेली इस्लामपूर शहराच्या नावबदलाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्यास अधिकृत मंजुरी दिली असून, भारतीय सर्वेक्षण विभागानेही या निर्णयाला मान्यता दर्शवली आहे. यानंतर आता सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आणि संस्थांमध्ये शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ असेच नमूद केले जाणार आहे.
राज्य सरकारचा प्रस्ताव आणि केंद्राची मंजुरी
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्राने त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आता हा निर्णय कायदेशीररित्या अमलात आला आहे. नामकरणाची मागणी तब्बल चार ते पाच दशकांपासून सुरू होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वप्रथम ही मागणी मांडली होती. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूरमधील सभेत या शहराला ‘ईश्वरपूर’ म्हणून संबोधत या मागणीला पाठिंबा दिला होता.
सर्व सरकारी नोंदींमध्ये बदल
या निर्णयामुळे आता ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ तसेच इतर सर्व सरकारी आणि निमसरकारी नोंदींमध्ये नवीन नावाचा वापर केला जाईल. सरकारी फलक, कागदपत्रे, वाहतूक परवाने आणि उद्योग विभागाच्या नोंदीतही हे बदल दिसून येतील. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. शहराच्या इतिहासाशी आणि धार्मिक ओळखीशी सुसंगत असे हे नाव असल्याचे नागरिकांचे मत आहे.
राज्यातील नावबदलांची परंपरा
महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’, तसेच अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाले होते. आता ‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ हे नामांतर त्या मालिकेतील आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.


