Beed Land Acquisition Scam: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळ्यात अखेर सर्वात मोठी कारवाई झाली आहे. या कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिवसभराच्या चौकशीनंतर अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने शुक्रवारी अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि तपासात सबळ पुरावे समोर आल्याने, पथकाने त्यांना लातूरमधून ताब्यात घेतले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या अटकेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
नेमका घोटाळा काय आहे?
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या संपादनात आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात (मावेजा) मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्यात पाठक यांचेही नाव होते. सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार या प्रकरणाचा तपास करत होत्या, मात्र त्या रजेवर असल्याने सध्या एम. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
प्रशासकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण
एका जिल्हाधिकारी दर्जाच्या आयएएस (IAS) दर्जाच्या अधिकाऱ्याला थेट घरून अटक झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. भूसंपादनाच्या नावाखाली झालेल्या या लुटीत अजून कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, याची माहिती आता पाठक यांच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या पाठक यांना लवकरच बीड न्यायालयात हजर केले जाणार आहे.


