महाराष्ट्र जागरण: उमेद अभियान व एसबीआय फाउंडेशनमुळे स्त्रियांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहातील महिला उद्योजकांसाठी ‘घे भरारी-मला पंख मिळाले’ हा नवाकोरा टीव्ही शो सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे. याबद्दलच श्रेया म्हणते, स्त्रियांना प्रत्येक कठीण प्रसंगातून जावे लागते.
मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळत नाही. पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. या कार्यक्रमातून ३९ महिलांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे हा अनुभव मला प्रत्यक्ष त्या स्त्रियांसह संवाद साधून अनुभवता येणार आहे.
प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खचून जाणारा क्षण येतोच, पण आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी उमेद मिळेल. आता स्त्री फक्त चूल, मूल सांभाळणारी नसेल तर ती एक उद्योजिकाही असेल. ‘उमेद अभियान’ चं खूप कौतुक वाटतं आणि या अभियानाचा मला एक भाग होता येतंय या गोष्टीचा आनंद आहे. घे भरारी- मला पंख मिळाले या कार्यक्रमाद्वारे स्वबळावर उभ्या राहिलेल्या ३९ महिलांशी संवाद साधण्यास व त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.


