Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी लोणावळ्याजवळ झालेल्या एका कार अपघातात आयआयटी (IIT) मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांतील ही दुसरी मोठी दुर्घटना असून एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे आयआयटी पवई परिसरात आणि मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
कसा घडला हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवई येथील आयआयटी मुंबईत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी बुधवारी कारने लोणावळ्याला सहलीसाठी गेले होते. गुरुवारी पहाटे मुंबईच्या दिशेने परतत असताना लोणावळ्याजवळ त्यांच्या पोलो कारवरचा ताबा सुटला आणि कार भीषणरीत्या पलटी झाली. यामध्ये ओमकुमार बोरसे (23), लय भारत (22) आणि श्रेयांश शर्मा या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात किंवा अतिवेगामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, कारचा झालेला चक्काचूर अपघाताची भीषणता स्पष्ट करत आहे.
एक्स्प्रेसवेवर मृत्यूचे सत्र; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हा अपघात इतका भयंकर होता की, एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 24 तासांपूर्वीच याच महामार्गावर एका कंटेनरने 5 वाहनांना चिरडले होते, ज्यामध्ये 3 जणांचा बळी गेला होता. गेल्या दोन दिवसांत एकूण 6 जणांनी आपला जीव गमावल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगावर मर्यादा आणण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बचावकार्य आणि वाहतुकीची सद्यस्थिती
अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, ‘देवदूत’ यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य ॲम्ब्युलन्सचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कटरच्या साहाय्याने मोठ्या कष्टाने बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हायवे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.


