Sushma Andhare: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “ज्यांनी महिलांच्या सन्मानासाठी मंत्रीपदाची खुर्ची सोडली, त्या बाबासाहेबांचा आदर्श तुमच्यात आहे का?” असा आक्रमक सवाल करत अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले.
पुरावे आणि ट्विट्सचा पाढा
मुंबईतील पत्रकार परिषदेत अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘खोटेपणा’वर प्रहार केला. २०२३ मधील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची जुनी ट्विट्स दाखवत त्यांनी विचारले की, “जर वर्षभरापूर्वीच हे विधेयक संसदेत मंजूर झाले होते, तर आज ते नामंजूर होण्याला विरोधक जबाबदार कसे? तुमची जुनी ट्विट्स खरी की आजची टीका खरी, हे आता स्पष्ट करा.”
श्यामाप्रसाद मुखर्जींचा दाखला आणि ‘भ्रूणहत्या’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या ‘भ्रूणहत्या’ या टीकेला अंधारे यांनी इतिहासाच्या आधारे चोख उत्तर दिले. १९५१ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनीच महिलांच्या अधिकारांना विरोध केल्याची आठवण करून देत, महिलांच्या हक्कांची पहिली ‘भ्रूणहत्या’ तुमच्याच वैचारिक पूर्वजांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. “तत्त्वासाठी राजीनामा देण्याचे धैर्य केवळ बाबासाहेबांनी दाखवले, तुमच्यात ती हिंमत आहे का?” असे आव्हानही त्यांनी दिले.
संघाला दिले चॅलेंज
केवळ फडणवीसांवर न थांबता, अंधारे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही यात ओढले. “तुम्ही मोठी आव्हाने देता, मग हिंमत असेल तर महात्मा फुलेंची ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही पुस्तके संघाच्या वार्षिक उत्सवात वाचून दाखवा,” असे म्हणत त्यांनी मोहन भागवतांच्या प्रतिक्रियेची विचारणा केली.
राजकीय संघर्षाला धार
संसदेत विधेयक रखडल्यानंतर भाजपने विरोधकांना ‘महिला हक्क विरोधी’ ठरवले होते. त्याला उत्तर देण्यासाठी अंधारे यांनी पुराव्यांसह मांडणी केल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावर सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


