Bee attack on Rajgad Fort: ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांत मधमाश्यांच्या हल्ल्यांनी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवेळा माची परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये आतापर्यंत 10 ते 15 पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक वारसा रक्षकांच्या माहितीनुसार, हे हल्ले प्रामुख्याने सकाळच्या सत्रात होत आहेत. ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांचे थवे तुटून पडतात. जखमींना चेहरा, हात आणि पाय या उघड भागांवर दंश झाला असून, काहींना वैद्यकीय उपचारांची गरज भासली आहे. सुदैवाने, सर्वजण धोक्याबाहेर आहेत.
किल्ल्याच्या परिसरातील खडक आणि भिंतींमध्ये अनेक भेगा, पोकळ्या असल्याने मधमाश्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात पोळे बांधल्याचे दिसून येते. अलीकडच्या पावसामुळे माशा अधिक आक्रमक झाल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पर्यावरण आणि वारसा रक्षकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मधमाश्यांच्या पोळ्यांचे वैज्ञानिक पद्धतीने स्थलांतर करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
राजगड किल्ला हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ असून, दर आठवड्याला शेकडो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


