Satara Boat Accident : सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या बामणोली परिसरात बुधवारी सायंकाळी निसर्गाच्या कोपाने एका आनंदी सहलीचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले. महाबळेश्वर तालुक्यातील शिवसागर जलाशयात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटली. या अपघातात मुंबईहून आलेले दोन पर्यटक सुदैवाने पोहत काठावर आले, मात्र बोटचालक पाण्याचा प्रवाहात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
सोसाट्याचा वारा ठरला ‘काळ’
काल सायंकाळी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरच्या तापोळा-बामणोली पट्ट्यातही अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे जलाशयातील लाटा उसळू लागल्या. यावेळी शिवसागर बोट क्लबची एक बोट मुंबईच्या दोन पर्यटकांना जलविहारासाठी घेऊन जात होती. सावरी गावच्या हद्दीत नवीन पुलाजवळ ही बोट वाऱ्याचा वेग सहन न झाल्याने पाण्यात उलटली.
पर्यटकांची मृत्यूशी झुंज यशस्वी, चालक अद्याप बेपत्ता
बोट उलटल्यानंतर जीवाची पर्वा न करता दोन्ही पर्यटकांनी जलाशयाच्या संथ पाण्यात पोहत किनारा गाठला आणि आपला जीव वाचवला. मात्र, बोटचालक रुपेश धोंडीबा तांबे हा अद्याप सापडलेला नाही. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांनी धाव घेतली असून शिवसागर बोट क्लबच्या सदस्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच आठवणी ताज्या
कोयना धरणाच्या जलाशयातील ही पहिलीच घटना नाही. बरोबर दोन वर्षांपूर्वी तेटली गावाजवळ अशाच प्रकारे वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट बुडाली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. कालच्या घटनेने या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या असून जल पर्यटनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


