Thane Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या ४ महिन्यांतच त्यांना पहिला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे आक्रमक प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परांजपे यांच्या या निर्णयामुळे ठाणे आणि पालघर परिसरात पक्षाला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजीनाम्यामागचे ‘इनसाईड’ कारण काय?
आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामागे ‘विधान परिषद’ उमेदवारीचा पेच असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेसाठी परांजपे यांचे नाव चर्चेत होते, मात्र पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याने ते प्रचंड नाराज होते. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांना जाब विचारला होता, तेव्हापासून त्यांना मुख्य प्रवाहात डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. “राष्ट्रवादीतील माझा १४ वर्षांचा प्रवास इथेच थांबवतोय, लवकरच नवीन सुरुवात करेन,” अशी भावूक पोस्ट लिहीत त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत.
सुनेत्रा पवारांसमोर आव्हानांचा डोंगर
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे आली आहे. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच पक्षातील एक जुना आणि अभ्यासू चेहरा सोडून गेल्याने सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहित पवारांनी यापूर्वीच ‘अजित पवार गटात गटबाजी’ असल्याचे विधान केले होते, ज्यावर आता परांजपेंच्या राजीनाम्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
परांजपेंनी सोडलेली पदे:
१. सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश)
२. अधिकृत प्रवक्ता
३. महाराष्ट्र समन्वयक (ठाणे व पालघर)
४. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व
आनंद परांजपे यांची भूमिका –
“पक्षाने आजवर माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक भावना मनात दाटून आल्या आहेत, पण आज हा प्रवास संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकत आहे.” सध्या आनंद परांजपे ‘नॉट रिचेबल’ असून ते सत्ताधारी शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


