Ashok Kharat Case: नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. राज्यातील तब्बल 39 बड्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी खरातच्या सांगण्यावरून स्वतःच्या करंगळ्या किंवा अनामिका कापून रक्ताचा नैवेद्य अर्पण केल्याचा आरोप नवलेंनी केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पुरोगामी विचारांच्या राज्यावर अंधश्रद्धेचे हे सावट पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.
अघोरी पूजा आणि बड्या नेत्यांचा सहभाग: नेमका आरोप काय?
शेतकरी कर्जमाफीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलताना कॉम्रेड अजित नवले यांनी खरात प्रकरणावर सडेतोड भाष्य केले. ते म्हणाले की, अशोक खरात हा ‘दोष निवारण’ करण्याच्या नावाखाली हायप्रोफाईल भक्तांना आपल्या शरीराचे रक्त वाहण्यास भाग पाडत असे. “रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी सोमवती अमावस्येला खरातच्या सांगण्यावरून बोटे कापल्याचे आरोप आधीच झाले आहेत, मात्र आता या यादीत आणखी 39 नावांची भर पडली आहे,” असा दावा नवलेंनी केला. बसता-उठता पुरोगामी महाराष्ट्राचा जप करणारे नेते प्रत्यक्षात इतक्या टोकाच्या अंधश्रद्धेला बळी पडतात, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
६ एप्रिलला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
अजित नवले यांनी केवळ आरोप करून न थांबता सरकारकडे आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री आणि आमदार शपथ घेताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्याचे आश्वासन देतात, मात्र खरातच्या दरबारात हजेरी लावून त्यांनी या शपथेचा भंग केला आहे, अशी टीका त्यांनी केली. ज्या लोकप्रतिनिधींनी अशा अघोरी कृत्यांत सहभाग घेतला, त्या सर्वांचे राजीनामे सरकारने घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ 6 एप्रिल रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र निदर्शने केली जाणार आहेत.
अशोक खरातचे ‘हायप्रोफाईल’ जाळे: अधिकारी आणि डॉक्टरही जाळ्यात
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, खरातचे संबंध केवळ राजकारण्यांशीच नव्हे तर इतर प्रभावशाली क्षेत्रांतही खोलवर रुजले आहेत. अनेक सनदी (IAS) आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या नियमित संपर्कात होते. याशिवाय नामवंत डॉक्टर, निष्णात वकील, मोठे व्यावसायिक आणि कलाकारांचेही खरातकडे येणे-जाणे होते. विशेष पूजा आणि ‘अध्यात्मिक उपचारांच्या’ नावाखाली खरातने या सुशिक्षित वर्गालाही आपल्या भुरळीत पाडून त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचे आता उघड होत आहे.


