सोलापूर : सलग मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांना पूरपाणी वेढा घालत असून, हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
दहिटणे गावातील घटना
दहिटणे गावातील लक्ष्मण काशिनाथ गवसाने (वय 58) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या दीड एकर कोरडवाहू शेतात सततच्या पावसामुळे पाणी साचले आणि पिके पूर्णपणे नष्ट झाली. त्यातच ते शारीरिक आजाराने त्रस्त होते. मानसिक तणावाखाली 23 सप्टेंबर रोजी ते घरातून बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील शेतात त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
कारी गावातील घटना
याच दिवशी शरद भागवत गंभीर (वय 45) या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली. गंभीर यांच्या साडेतीन एकर शेतात पेरू व लिंबाची बाग होती. सलग पावसामुळे बागेचे संपूर्ण नुकसान झाले. त्यांच्यावर बँकेचे सुमारे 7 लाखांचे कर्ज आणि गावकऱ्यांकडून घेतलेले आणखी 3 लाखांचे कर्ज होते. दहा लाखांच्या ओझ्यामुळे आणि शेतीतून उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने त्यांनी गायीला बांधलेल्या दावणाच्या दोरीने गळफास घेतला.
या दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाली असून तपास सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.


