Bhiwadi Fire : सोमवारी सकाळची वेळ भिवाडी औद्योगिक क्षेत्रासाठी काळ बनून आली. खुसखेडा येथील एका खासगी केमिकल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ७ कामगारांचा अत्यंत करुण अंत झाला. आगीची दाहकता इतकी प्रचंड होती की, बाहेर काढलेल्या मृतदेहांचे केवळ सांगाडे उरले असून त्यांची ओळख पटवणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे.
नेमकी घटना काय?
खुसखेडा औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक G-1-118 B मधील कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार कामात व्यस्त होते. नऊच्या सुमारास अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि पाहता पाहता संपूर्ण फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रसायने साठवलेली असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ इतके उंच होते की कित्येक किलोमीटर अंतरावरून धूर दिसत होता. सकाळी ९:२२ ला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, मात्र तोपर्यंत आगीने सर्व काही कवेत घेतले होते.
विदारक दृश्य आणि हानी:
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जेव्हा पथकाने आत प्रवेश केला, तेव्हा तिथे केवळ मृत्यूचे थैमान पाहायला मिळाले. या घटनेत सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे शरीर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
प्रशासनाची भूमिका आणि चौकशी:
या भीषण दुर्घटनेमुळे औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, कारखान्यात अग्निसुरक्षा नियम पाळले गेले होते का? याची सखोल चौकशी आता पोलीस आणि प्रशासन करत आहे.


