Sushma Andhare: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर बोचरी टीका करत, “आता तरी झोपेतून जागे व्हा आणि सत्तेचा अहंकार सोडा,” असा सल्ला दिला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या की, चाकणकर सध्या जमिनीवर आल्या आहेत आणि भविष्यात त्यांची घसरण आणखी होणार आहे. केवळ राजीनामा देऊन हे प्रकरण मिटणार नाही, तर अशोक खरात प्रकरणात त्यांना सहआरोपी करून तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
संघटित गुन्हेगारीचा आरोप आणि ‘मकोका’ची मागणी
अशोक खरात यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या कथित गैरप्रकारांमध्ये रुपाली चाकणकर यांचा थेट सहभाग असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. चाकणकर या संघटित गुन्हेगारी टोळीचा भाग असून, त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका अंधारे यांनी मांडली. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात केवळ नैतिक जबाबदारी स्वीकारून चालणार नाही, तर कायद्याचा बडगा उगारणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
बदनामीची नोटीस आणि डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
रुपाली चाकणकर यांनी आपली बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला होता. याला प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, “गेलेली अब्रू पुन्हा मिळवता येत नाही.” चाकणकर सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून, पुराव्यांशी छेडछाड करू नये म्हणून त्यांनी आपली एकही सोशल मीडिया पोस्ट डिलीट करू नये, असे आव्हानही त्यांनी दिले. सोमवती अमावस्या आणि बोट कापलेल्या फोटोंवरून सुरू असलेल्या वादावर अंधारे यांनी ठाम राहत, चाकणकर सध्या पराभवाच्या धास्तीने सैरभैर झाल्याची टीका केली.
तटकरेंच्या आशीर्वादावर प्रश्नचिन्ह
सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या वैचारिक भूमिकेवरही निशाणा साधला. जाहीर कार्यक्रमात संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात कर्मकांडाचे पालन करायचे, ही त्यांची दुटप्पी भूमिका उघडी पडल्याचे त्या म्हणाल्या. “सुनील तटकरे यांचा वरदहस्त असेपर्यंत आपल्याला कोणीही स्पर्श करू शकणार नाही, अशा भ्रमात चाकणकर होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारताच त्यांचे धाबे दणाणले आहेत,” असे सांगत अंधारे यांनी ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा शब्दांत चाकणकरांच्या वर्तनाचा निषेध केला. ५०० ते ६०० कोटींची कथित संपत्ती आणि सत्तेचा वरदहस्त यामुळेच हा अहंकार वाढल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


