Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताच्या बातमीने संपूर्ण देश हादरला असतानाच, जयपूर विमानतळावर आणखी एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली आहे. एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग फेल झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. विशेष म्हणजे, या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा प्रवास करत होते. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून रंधवा यांच्यासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
धावपट्टीला स्पर्श झाला अन् वैमानिकाने विमान पुन्हा हवेत झेपावले
एअर इंडियाचे ‘AI-1719’ हे विमान दिल्लीहून जयपूरसाठी निघाले होते. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी विमान जयपूर विमानतळावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. विमान धावपट्टीवर (Runway) टेकणार इतक्यात तांत्रिक बिघाड किंवा धावपट्टीवरील प्रतिकूल स्थितीमुळे विमानाचे संतुलन बिघडले. लँडिंग सुरक्षित होणार नाही हे लक्षात येताच वैमानिकाने अत्यंत वेगाने निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत उडवले (Go-Around).
१० मिनिटे हवेत घिरट्या अन् दुसऱ्या प्रयत्नात यश
पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. विमान तब्बल १० मिनिटे जयपूरच्या आकाशात घिरट्या घालत होते. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून वैमानिकाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला आणि विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. विमान जमिनीवर स्थिर होताच सुखजिंदर सिंह रंधवा यांच्यासह सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
काय असते ‘गो-अराउंड’ (Go-Around) प्रक्रिया?
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा वैमानिकाला लँडिंगसाठी धावपट्टी सुरक्षित वाटत नाही किंवा काही तांत्रिक अडथळा येतो, तेव्हा जमिनीला स्पर्श करण्याच्या काही सेकंद आधी विमानाची गती वाढवून ते पुन्हा हवेत नेले जाते. या प्रक्रियेला ‘गो-अराउंड’ म्हणतात. जयपूरमध्ये वैमानिकाने हीच पद्धत वापरल्याने एका मोठ्या अपघाताची शक्यता मावळली. एकीकडे बारामतीत अजितदादांच्या विमानाचा स्फोट होऊन राज्याने आपला लाडका नेता गमावला असतानाच, जयपूरमधील या घटनेने व्हीआयपी सुरक्षा आणि विमान प्रवासातील तांत्रिक बाबींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


