महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक वैचारिक -राजकीय प्रभुत्व निर्माण करणारी चळवळ कशी होती आणि ‘मराठी भाषा’ व ‘महाराष्ट्राचे भविष्य’ हे एकमेकांत कसे गुंतलेले आहे-याची साधार चर्चा करणारी पुस्तिका म्हणजे ‘महाराष्ट्रा! वळूनी बघ जरा…!’ व्यक्ती म्हणून आत्मभान असलेली आपली सामाजिक ओळख म्हणजे ‘अस्मिता’ आणि याच सामाजिक अस्मितेला उभा करणारा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे ‘भाषा’. थोडक्यात व्यक्ती आणि समाज यांच्या अनुबंधातून निर्माण होते भाषा. भाषा ही मुळात संकेतप्रणाली असते. आपण भाषेला अर्थ प्रदान करत असतो, त्यातून लोकांची ‘सामाजिक जाणीव‘(Social Awareness/Identity) आकार घेत असते. म्हणूनच ’भाषा’ हा कोणत्याही समाजव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा मूलभूत घटक ठरतो. या अर्थाने भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून एक व्यापक ‘सामाजिक संकल्पना’ कशी आहे,याविषयीचे विचार मंथन महाराष्ट्रभाषेच्या (मराठी भाषेच्या ) आकलनासंदर्भात अजित अभ्यंकर यांनी “महाराष्ट्रा! वळुनि बघ जरा…” या पुस्तिकेत केले आहे.
समाज,भाषा, राज्यव्यवस्था, संस्कृती, राष्ट्रवाद,समाजवाद, नव-उदारमतवाद, मार्क्सवाद इत्यादी संकल्पना खास ‘महाराष्ट्रीय जाणिवेने’ स्पष्ट करून वास्तववादी दृष्टिकोनातून श्रीचक्रधरांच्या यादवकाळापासून प्रचलित असलेली ‘राजभाषा’ संत ज्ञानेश्वरांनी ‘धर्मभाषा’ म्हणून कशी पुढे आणली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राज्यकारभाराची भाषा’ म्हणून कशी रुजवली याविषयीचा धावता आलेख अजित अभ्यंकर मांडतात आणि आजच्या मराठीचे ‘अस्सलपण’ (Originality) टिकवून ठेवण्याचा आग्रह धरतात.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
खरं तर कामगारवर्ग आणि मध्यमवर्गीयांनी घडवलेली मुंबई स्वतःचं ‘महाराष्ट्रीयत्व’ टिकवून ठेवण्यासाठी अव्यवहार्य अशा द्वैभाषिक राज्य निर्मितीच्या निर्णयापासून ते तत्कालीन काँग्रेसच्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव असणाऱ्या त्रिराज्य योजनेपर्यंत अनेक संघर्षातून स्वतःची वाट घडवत गेली. एका दशकाहून अधिक काळ चाललेला संघर्ष व १०६ प्राणांचे बलिदान, तसेच आचार्य अत्रे, एस.एम.जोशी,प्रबोधनकार ठाकरे, उद्धावराव पाटील, सेनापती बापट, गोदावरी परुळेकर,शंकरराव देव, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, ना. ग. गोरे, हौसाबाई पाटील, दत्ता गव्हाणकर, आत्माराम पाटील, भाऊसाहेब हिरे, दादासाहेब गायकवाड, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते यांसह अनेक लढवाय्यांचे योगदान आणि गुजरातला 50 कोटी व्याज देऊन मिळालेली ही ‘मुंबई’ महाराष्ट्राचा जागृत अभिमान आहे. हाच अभिमान आणि हीच महाराष्ट्राची राजभाषा जोपासणे आणि अधिकाधिक समृद्ध करत जाणे हेच शासन म्हणून राज्यव्यवस्थेचे आणि महाराष्ट्रीय म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
मराठीचे अस्तित्व :
मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त भाषिक नाही,तर आर्थिक -सामाजिक प्रश्न आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून व्यवहाराचेही माध्यम असते.हा व्यवहारआर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध पातळ्यांवर एकाच वेळी चाललेला असतो.म्हणून भाषा ही अत्यंत व्यापक असते. मुंबईत मराठी भाषेचा आग्रह धरला जातो, तो याचसाठी. दैनंदिन व्यवहाराची भाषा टिकवून ठेवणे व समृद्ध करणे ही प्रादेशिक अस्मितेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे.
‘भारतात ज्या -ज्या राज्यांमध्ये भाषिक -प्रादेशिक अस्मिता ही प्रगल्भ आणि सखोल आहे,तेथे सामाजिक विकासाचे निर्देशांक अधिक प्रगत आहेत.’ याचा दाखला संयुक्त राष्ट्राचा ‘मानव विकास निर्देशांक’ (HDI), नीती आयोगाचे विविध अहवाल यांच्या आधारे अजित अभ्यंकर देतात. या अर्थाने, भाषा ही सामाजिक उत्पादन व पुनारूत्पादनाची-समाज निर्मितीची(society building )एक महत्वाची पायरी आहे, हे स्पष्ट होते. म्हणून प्रादेशिक अस्मिता ही संघराज्य व्यवस्थेत महत्वाची ठरते. भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात ‘अखिल भारतीय एकत्वाची जाणीव’(Awareness of Unity)आणि ‘प्रादेशिक-भाषिक-सांस्कृतिक अस्मिता’(Regional-Linguistic-Cultural Identity) हॆ पैलू अत्यंत महत्वाचे ठरतात आणि हिंदीसक्ती सारखे निर्णय गैरलागू ठरतात.


