Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, त्यांना आता आणखी एक महिना मुदत देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
महत्त्वाचे निर्णय आणि सवलत
यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. मात्र, अनेक महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै २०२४ पासून सुरू असलेल्या या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मुदतवाढ म्हणजे त्रुटी दुरुस्त करण्याची शेवटची संधी असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी – आदिती तटकरे
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना आदिती तटकरे यांनी पीडित महिलांच्या बाजूने खंबीर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी (SIT) स्थापन केली असून, त्याचे नेतृत्व अनुभवी महिला पोलीस अधिकारी करत आहेत. पीडित महिलांना न्याय मिळवून देणे ही सरकारची प्राथमिकता असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
पक्ष विलीनीकरण आणि नेतृत्वावर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना आदिती तटकरे यांनी ‘दादांच्या पश्चात’ निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रकाश टाकला. सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत मांडलेली भूमिका स्पष्ट होती. दादांच्या (अजित पवार) काळात आणि त्यांच्या पश्चात असलेल्या परिस्थितीमध्ये फरक आहे. पक्षात विलीनीकरणाबाबत कोणतीही संघटित चर्चा झाली नव्हती. तसेच सुनेत्राकाकींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याबाबतही ठोस भूमिका समोर न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, असे त्यांनी नमूद केले.


