Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महामार्गावर अत्याधुनिक ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (HTMS) कार्यान्वित करण्यासाठी उद्या, ३१ जानेवारीपासून ते ३ फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ठराविक टप्प्यांवर वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.
नेमके कारण काय?
महामार्गावरील वाहतूक शिस्तबद्ध व्हावी आणि वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी ‘गँट्री’ (पोलादी सांगाडे) उभारले जात आहेत. या यंत्रणेवर खालील अत्याधुनिक सोयी असतील:
- नंबर प्लेट ओळख: स्वयंचलित कॅमेऱ्यांद्वारे गाड्यांच्या नंबर प्लेट टॅप करणे.
- वेग नियंत्रण: ओव्हरस्पीडिंग रोखण्यासाठी आधुनिक वेगमापक यंत्रे.
- रीअल-टाइम अपडेट्स: डिजिटल बोर्डद्वारे प्रवाशांना हवामान आणि वाहतुकीची माहिती देणे.
ब्लॉकचे वेळापत्रक: कुठे आणि कधी रस्ता बंद?
३१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत महामार्गावर पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबवण्यात येईल:
वर्धा तालुका : दु. 12 ते 1, दु. 3 ते 4 (नागपूरकडे येणारा).
सेलू तालुका : दु. 12 ते 1 (मुंबईकडे जाणारा).
सेलू तालुका : दु. 3 ते 4 (नागपूरकडे येणार).
हिंगणा तालुका : दु. 12 ते 1 (नागपूरकडे येणारा).
हिंगणा तालुका : दुपारी 3 ते 4 (मुंबईकडे जाणारा).
आर्वी तालुका : दुपारी 3 ते 4 (मुंबईकडे जाणारा)
प्रवाशांना आवाहन
पुढील चार दिवस नागपूर, हिंगणा, सेलू, वर्धा आणि आर्वी या पट्ट्यात गँट्री उभारणीचे काम १४ टप्प्यांत चालणार आहे. कामाच्या वेळी संबंधित मार्गिका ६० मिनिटांपर्यंत पूर्णतः बंद ठेवली जाणार असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या वेळापत्रकाचा विचार करूनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


