पुणे: राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून मत चोरीचा मुद्दा जोर लावून धरला होता. त्यातून त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत चोरीच्या मुद्यावर राजकीय पक्ष सावध होत असताना मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील मतदारच चोरल्याच प्रकार उघडकीस आला आहे. मुळशी धरणग्रस्त भागातील तब्बल 988 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली.
या मतदारांच्या नावाचा समावेश कोथरुड भागामध्ये नवीन मतदार म्हणून करण्यात आला. मतदारांची नावे परस्पर कोथरुडमध्ये समावेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झाला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत थेट आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. धरणग्रस्त भागातील मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतदार समजला जातो.
शिवसेनेत फूट पडली त्यावेळी धरणग्रस्त भागातील शिवसैनिक ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिला. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मतदार यादी चेक करत असताना आपल्या भागातील मतदारांची नावे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली.
कार्यकत्यांनी सखोल माहिती घेतली असता 988 मतदारांची नावेच गावातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायब झालेल्या नावांमध्ये वांद्रे आणि आदरवाडीतील प्रत्येकी १०९, बार्पे 91, वडगाव 50, वाघवाडी 15, ताम्हिणी 44, ढोकळवाडी 35 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे गावामधील मतदार चोरणार कोथरुडमधील कार्यकर्ता नक्की कोण याचा शोध घेण्याची देखील मागणी होत आहे.


