Sanjay Raut: आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता थेट भारतीय स्वयंपाकघरांना बसू लागला आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “देशात सध्या ‘नरेंद्र भी गायब आणि सिलेंडर भी गायब’ अशी स्थिती आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
माझ्या घरातही सिलेंडर नाही – राऊतांची व्यथा
गॅस टंचाईची दाहकता सांगताना संजय राऊत यांनी स्वतःच्या घराचे उदाहरण दिले. “माझ्या पत्नीला गेल्या दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये. महानगर गॅसची सुविधा असली, तरी अतिरिक्त सिलेंडरची गरज प्रत्येकाला लागते. आज सकाळपासून मला ६०-७० लोक भेटले, जे केवळ सिलेंडर कुठे मिळेल, हेच विचारत होते,” असे सांगत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य मांडले.
‘नोटाबंदीसारखी भयंकर स्थिती’
देशभरातील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, आज मुंबई, दिल्लीपासून ते अगदी जम्मूपर्यंत सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. “नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून लोक दगावले होते, तीच भीती आता सिलेंडरच्या रांगेबाबत निर्माण झाली आहे. लोकांना रांगेत उभे करणे आणि त्यांना त्रास देणे, हा भाजपचा छंद बनला आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
हेही वाचा –
पंतप्रधानांच्या आवाहनाचा घेतला समाचार
पंतप्रधानांनी ‘कोविडप्रमाणेच ही परिस्थिती सांभाळून घेऊ, नागरिकांनी घाबरू नये’ असे आवाहन केले होते. यावर राऊतांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “हो, कोविडमध्ये त्यांनी देश कसा सांभाळला हे आपण पाहिले आहे. गंगेत प्रेते वाहत होती आणि गुजरातच्या स्मशानभूमीत जागा उरली नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयशामुळेच आज भारतीयांवर ही वेळ आली आहे.”


