पुणे: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर या घटनेने मोठे वादंग निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या असून पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केले. ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून जागा पवित्र करण्यात आली. यानंतर आता हिंदू महासभेने पुढे येत ऐतिहासिक शनिवार वाड्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा आणि आधार कार्ड तपासूनच आत सोडावे, अशी मागणी केली आहे.
शनिवार वाडा ही पेशव्यांच्या काळातील ऐतिहासिक वास्तू असून ती 1730 मध्ये बांधली गेली. या वाड्याला मराठी इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथे नमाज पठणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने आंदोलन केले. त्यानंतर हिंदू महासभेनेही या प्रकरणात उडी घेत सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे.
हिंदू महासभेने आरोप केला की, “सरकारमधील लोकांनी पोलिसांना स्पष्ट आदेश देण्याऐवजी टाइमपास करण्यासाठी 8 दिवसांची वेळ दिली. मात्र त्या काळात काहीच कारवाई झाली नाही. पोलिसांनी या 8 दिवसांत काय केलं, हे आम्ही विचारणार आहोत,” असे महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शनिवार वाड्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा, असा लेखी निवेदनही देण्यात येणार असल्याचे सांगितले.
महासभेच्या निवेदनात म्हटले आहे की, “पुण्यात सातत्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी कृत्ये होत आहेत. सारसबाग, लालमहाल आणि शनिवार वाडा यांसारख्या हिंदू इतिहासाशी निगडित वास्तूंवर वारंवार असे प्रकार घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या नमाज पठणाच्या घटनेमुळे धार्मिक वातावरण बिघडले आहे.”
संघटनेने पुढे नमूद केले आहे की, “14 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान शनिवार वाड्यातील दर्ग्याचा अनधिकृत विस्तार झाला आहे. पुरातत्त्व खात्याकडे आणि पोलिस प्रशासनाकडे आम्ही या संदर्भात तक्रार केली होती. 2022 साली पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित व्यक्तीने दर्गा काढण्याचे आश्वासन दिले होते, पण तसे झाले नाही. नुकत्याच झालेल्या नमाज पठणाला 8 ते 10 दिवस झाले असून अजूनही कोणतीही ठोस माहिती किंवा कारवाई झालेली नाही.”
शेवटी हिंदू महासभेने प्रशासनाला मागणी केली आहे की, शनिवार वाड्यातील अनधिकृत दर्गा तात्काळ हटवावा आणि या ठिकाणी हिंदू धर्मियांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करावी. तसेच प्रवेश करताना आधार कार्ड तपासूनच लोकांना आत सोडण्यात यावे, अशी विनंती केली आहे.


