Air India Plane Crash: गेल्या वर्षी 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशाला हादरवून सोडले होते. लंडनला जाणाऱ्या या विमानाला नेमका अपघात कसा झाला, याचे गूढ आता उकलण्याची शक्यता आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’ने (FIP) सरकारला लिहिलेल्या एका विशेष पत्राने या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण दिले आहे.
बॅटरी ठरली ‘सायलंट किलर’?
पायलट्स संघटनेने सरकारला सादर केलेल्या 21 पानांच्या सविस्तर अहवालात असा दावा केला आहे की, हा अपघात मानवी चुकीमुळे (Human Error) झालेला नाही. विमानातील लिथियम बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हा भीषण अनर्थ ओढवला. या तांत्रिक बिघाडाचे पुरावेही संघटनेने पत्राद्वारे दिले आहेत.
पायलटने बटण न दाबताच इंजिन ‘डेड’
पत्रातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे, शॉर्ट सर्किटमुळे विमानाची संपूर्ण सिस्टीम कोलमडली होती. शॉर्ट सर्किटमुळे विमानातील दोन्ही इंजिनचे ‘फ्यूल स्विच’ (इंधन पुरवठा करणारी बटणे) आपोआप बंद झाली. धक्कादायक म्हणजे, वैमानिकांनी इंधन बंद करण्यासाठी कोणतीही हालचाल केली नव्हती, तरीही यंत्रणेने इंधन पुरवठा तोडला. परिणामी, उड्डाण घेतल्यावर काही मिनिटांतच विमान कोसळले.
सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
लिथियम बॅटरीमुळे इंजिनवरचे नियंत्रण सुटणे, ही विमान वाहतूक क्षेत्रातील अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. ‘FIP’ च्या या दाव्यामुळे आता विमानांच्या तांत्रिक सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पत्रानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) आता नेमकी काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


