मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर झाला आहे.
मुंबईत पाणीच पाणी, वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली
मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे, तर लोकल ट्रेनही उशिराने धावत आहेत. पावसाच्या तीव्रतेमुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठवाड्यात पावसाचा कहर; 6 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेड, बीड आणि हिंगोलीत मिळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. मराठवाड्यातील 57 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
बुलढाण्यात अतिवृष्टी, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे प्रशासनाने आज आणि उद्या या दोन तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मन नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मन प्रकल्पाचे पाचही दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
हिंगोलीत नद्या-नाल्यांना पूर
हिंगोलीत सततच्या पावसामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. विदर्भातील पावसाचे पाणी ईसापूर धरणात येत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ओढे आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रायगडमध्ये सखल भाग जलमय
रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे महाड आणि पोलादपूरमधील सखल भागात पाणी साचले आहे. महाडमधील काही शाळांच्या पटांगणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी चिखलातून वाट काढावी लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुढील 48 तास महत्त्वाचे
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी उद्या शाळांना सुट्टी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


