Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा देणारी मोठी घोषणा केली आहे. पुणे आणि संभाजीनगर (औरंगाबाद) या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा अत्याधुनिक एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. सध्या पुण्याहून संभाजीनगरपर्यंत प्रवासासाठी सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागतो. नव्या एक्स्प्रेस हायवेमुळे हा प्रवास निम्म्याहूनही कमी होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महामार्गाची रूपरेषा काय असेल?
या प्रकल्पाची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, पुणे-अहिल्यानगर-संभाजीनगर असा एक प्रमुख मार्ग प्रथम सुधारित करण्यात येणार आहे. या मार्गावर आवश्यक ठिकाणी पूल आणि इतर संरचनात्मक कामे केली जाणार असून त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचा दर्जा पूर्णपणे अद्ययावत केला जाईल.
हेही वाचा –पुणेकरांनो लक्ष द्या! ‘एफ सी’ रोडवरील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा
दुसरा पर्यायी मार्ग विकसित केला जाणार
याशिवाय, शिक्रापूर येथून सुरू होणारा दुसरा पर्यायी मार्ग विकसित केला जाणार आहे. हा मार्ग अहिल्यानगर शहराला वळसा घालत थेट बीड जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पुढे संभाजीनगरशी जोडला जाईल. हा संपूर्ण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे असणार आहे. या मार्गासाठीही १६ हजार ३१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रकल्पाशी संबंधित बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सध्या केवळ एका टोल स्थानांतराचा निर्णय प्रलंबित असून तो झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या प्रक्रियेसाठी अंदाजे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पुणे ते नागपूर दोन-अडीच तासांत?
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ पुणे ते संभाजीनगरच नव्हे, तर संभाजीनगर ते नागपूर हे अंतरही सुमारे अडीच तासांत पार करता येईल. एकूणच हा एक्स्प्रेस हायवे पुणे ते नागपूर असा विस्तारित दळणवळण मार्ग ठरणार असल्याचे गडकरी यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा – Pune Airport : पुणे विमानतळावरील बिबट्या अखेर जेरबंद! ७ महिन्यांच्या मोहिमेनंतर अडकला पिंजऱ्यात
महाराष्ट्रात रस्ते विकासाला गती
नितीन गडकरी यांनी यावेळी राज्यातील इतर महामार्ग प्रकल्पांबाबतही माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. हडपसर ते यवत महामार्गासाठी सामंजस्य करार झाला असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल. एनएचएआयच्या माध्यमातून पुणे (खेड) ते नाशिक फाटा हा महामार्ग विकसित केला जाणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ९३ टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड अशा दोन टप्प्यांत हे काम होणार आहे.


