Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Yashwant Sugar Factory: यशवंत साखर कारखान्याच्या २९९ कोटींच्या जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Yashwant Sugar Factory: यशवंत साखर कारखान्याच्या २९९ कोटींच्या जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Yashwant Sugar Factory: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित जमीन व्यवहारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करत स्थगिती दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला सुमारे २९९ कोटी रुपयांना ही जमीन खरेदी करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली होती. मात्र, या व्यवहारासाठी आवश्यक असलेली महसूल विभागाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, महसूल विभागाकडून या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची सखोल चौकशी केली जाणार असून, तपासणी अहवाल सादर होईपर्यंत कोणतीही पुढील प्रक्रिया केली जाणार नाही. त्यामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.

महसूल विभागाची परवानगी का महत्त्वाची?

या व्यवहारात अनेक संशयास्पद बाबी पुढे आल्या आहेत. जमीन खरेदीसाठी केवळ ५०० रुपयांच्या नोटरी कराराचा वापर करण्यात आल्याचा आरोप असून, नोंदणीकृत दस्तऐवज न करता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने कारखान्याला तब्बल ३६ कोटी ५० लाख रुपये अदा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, संबंधित जमीन प्रत्यक्षात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नसून तिचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे आहे. ही जमीन चिंचवड देवस्थानच्या मालकीची असून ती वर्ग–3 मध्ये मोडते. त्यामुळे ही जमीन वर्ग–1 मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे का, तसेच राज्य सहकारी बँकेने या व्यवहारास मंजुरी दिली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक ठरले आहे. या सर्व कारणांमुळे महसूल विभागाच्या परवानगीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा –Hurda Party: मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांनी केली कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश

प्रशांत काळभोर यांच्या निवेदनामुळे प्रकरण चर्चेत

दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी महसूल विभागाची मंजुरी न घेतल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी परवानगी मिळेपर्यंत जमीन व्यवहार थांबवण्याची मागणी केली होती. १६ सप्टेंबर रोजी शासन निर्णयाद्वारे ९९ एकर ९७ आर क्षेत्राची ही जमीन २९९ कोटी रुपयांना विक्री करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, आवश्यक पूर्वपरवानगी नसल्याचे स्पष्ट होताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली.

तपासणीचा आदेश, अहवालाची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सहकार व पणन विभागाने या प्रकरणात हालचाली सुरू केल्या आहेत. सहकार व पणन कक्ष अधिकारी सरिता डेहणकर यांनी साखर आयुक्त आणि पणन संचालक यांना पत्र पाठवून संपूर्ण व्यवहाराचा सविस्तर अहवाल व स्पष्ट अभिप्राय तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल व वन विभागाचे १२ डिसेंबरचे पत्र तसेच प्रशांत काळभोर यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा – Pune Land Scam : ‘FIR मध्ये नाव नाही म्हणून…’;  देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन

३६.५० कोटी रुपयांचे पुढे काय?

दरम्यान, नोंदणीकृत सामंजस्य करार न करता केवळ नोटरी दस्तऐवजाच्या आधारे ३६ कोटी ५० लाख रुपये कारखान्याला देण्यात आल्याचा आरोप काही संचालकांनी केला आहे. व्यवहारावर स्थगिती आल्यामुळे ही रक्कम पुढे कशी वसूल होणार किंवा तिचे काय होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी केवळ नोटरी करारावर झालेल्या केंजळे जमीन प्रकरणात कायदेशीर अडचणी आल्याचा अनुभव लक्षात घेता, या व्यवहारातही अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराचे भविष्य पूर्णपणे महसूल विभागाच्या चौकशी अहवालावर अवलंबून राहणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!