Pune Crime: रक्षणकर्तेच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा समाजाची नैतिकता किती खालावली आहे याचे विदारक दर्शन घडते. शिक्षणाच्या वयात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला संसाराच्या जोखडात ओढून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार चहोली खुर्द परिसरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या पोटच्या मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी आई-वडिलांसह एकूण सात जणांविरुद्ध आळंदी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा अघोरी प्रकार घडला. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे २ महिन्यांची असताना, तिच्या भविष्याचा विचार न करता आई-वडील, मामा आणि सासरच्या मंडळींनी मिळून तिचा विवाह लावून दिला. कायद्याने लग्नाचे वय नसतानाही तिला बळजबरीने या नात्यात ढकलण्यात आले.
अत्याचार आणि अल्पवयात मातृत्व
लग्नानंतर पीडितेचा छळ थांबला नाही. सासरी पतीकडून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी अल्पवयातच गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलीवर मातृत्व लादले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आळंदी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली आहेत. पीडितेचा पती, सासू-सासरे, आई-वडील आणि मामा यांच्यासह सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजात संतापाची लाट
स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनीच एका मुलीचे आयुष्य अंधकारात लोटल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


