Weather Update: हिवाळा निरोप घेत असतानाच आता हवामान शास्त्रज्ञांनी एक अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे. केवळ 2026 हे वर्षच नव्हे, तर पुढील तीन वर्षे म्हणजे 2028 पर्यंत जगाला प्रचंड उष्णतेचा (Extreme Heat) सामना करावा लागणार आहे. पॅसिफिक महासागरात सक्रिय होणारा ‘अल निनो’ आणि वातावरणातील वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे जगभरातील तापमानाचा पारा नवा उच्चांक गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बदलांमुळे मानवी जीवनावर आणि निसर्गावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.
२०२७ ठरणार ऐतिहासिक उष्ण वर्ष?
हवामान तज्ज्ञांच्या मते, 2024 आणि 2025 मधील भीषण उष्णतेनंतर 2026 हे वर्ष जगातील चौथे सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. मात्र, खऱ्या संकटाची सुरुवात 2027 मध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन हवामान तज्ज्ञांनुसार, 2026 मध्ये सुरू झालेली ‘अल निनो’ची स्थिती 2027 मध्ये अधिक उग्र रूप धारण करेल. यामुळे 2027 हे वर्ष गेल्या अनेक वर्षांतील उष्णतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत, फेब्रुवारी अखेरपर्यंत दिल्लीसह उत्तर भारतातील तापमान 30 अंशांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत.
भारतावर होणारा परिणाम आणि मान्सूनची चिंता
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, ‘ला निना’चा प्रभाव आता ओसरत असून ‘अल निनो’ डोके वर काढत आहे. याचे गंभीर परिणाम भारतावर दिसून येतील. विशेषतः मे ते जून दरम्यान उत्तर आणि पश्चिम भारतात प्रखर उन्हाच्या लाटा (Heat Waves) येतील. सर्वात मोठी चिंता मान्सूनबाबत व्यक्त केली जात आहे; ‘अल निनो’मुळे पावसाचे वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम शेती आणि पाणीपुरवठ्यावर होईल. मार्च-एप्रिलमध्ये दक्षिण आणि ईशान्य भारतात तापमान काहीसे नियंत्रणात राहील, मात्र तिथेही पावसाची कमतरता जाणवू शकते.


