Priyanka Chaturvedi: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत मोठे नाट्य पाहायला मिळाले. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पक्षप्रमुखांसमोरच आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत नेमका वाद कशावरून झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील राज्यसभा जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांनी या जागेसाठी ठाकरेंशी संपर्क साधला होता. “आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार, तुम्ही राष्ट्रवादीशी बोला,” असे सांगत ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संभाव्य संघर्ष कसा टाळला, याचे विवेचन बैठकीत केले. मात्र, याच दरम्यान प्रीयंका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत संताप व्यक्त केला. “I want to protest,” असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव का घेतले?” असा सवाल त्यांनी थेट विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू सावरत, “ते बोलले म्हणून काय झाले, शेवटी निर्णय मीच घेणार आहे,” असे स्पष्ट करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
खासदारांची आदित्य ठाकरेंवरही नाराजी?
या बैठकीत केवळ अंतर्गत वादच नाही, तर नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा झाल्याचे समजते. मराठवाड्यातील एका खासदाराने प्रियांका चतुर्वेदी यांना दिलेल्या 6 वर्षांच्या संधीबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच, आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात अधिक सक्रीय होण्याची गरज असल्याचे मत काही खासदारांनी व्यक्त केले. “आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करायला हवा,” अशी तक्रार खासदारांनी केल्यावर आदित्य ठाकरे काहीसे नाराज दिसले आणि त्यांनी त्यानंतर कोणताही संवाद साधला नाही.
‘माझा तुमच्यावर विश्वास’ – उद्धव ठाकरे
बैठकीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. “भाजप आणि राष्ट्रवादीकडून तुमचे खासदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही संपूर्ण लढाई मी तुमच्याच जीवावर लढत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सहकाऱ्यांचे मनोबल वाढवले.


