आपल्यापैकी अनेकजण जिमला जात असतील. त्यात सकाळी उठल्याबरोबर सप्लिमेंट्सची बाटली उघडणे ही जणू अनेक लोकांची रोजची सवय झाली आहे. काहींना वाटते की यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, काही जण अधिक ऊर्जेसाठी व्हिटॅमिन्स घेत आहेत, तर काही जण उत्तम आरोग्याच्या आशेने दररोज वेगवेगळ्या कॅप्सूल्स घेत आहेत. मात्र, तुमचं हे करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जर एखादे व्हिटॅमिन शरीरासाठी चांगले असेल, तर जास्त डोस घेतल्यास आणखी जास्त फायदे मिळतील, असे अनेकांना वाटत असते. मात्र, शरीर फक्त त्याला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचाच वापर करते. जर शरीराला आधीच पुरेसे पोषण मिळत असेल, तर अतिरिक्त सप्लिमेंट्स अनेकदा कोणताही फायदा न देता शरीराबाहेर टाकले जातात. व्हिटॅमिन सी सारखी काही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात आणि शरीरातून बाहेर टाकली जातात, परंतु व्हिटॅमिन ए आणि डी सारखी जीवनसत्त्वे शरीरात साठू शकतात. यामुळेच त्यांचे अतिरिक्त सेवन कधीकधी हानिकारक ठरू शकते.
निरोगी व्यक्तींमध्ये दररोज व्हिटॅमिन सप्लिमेंटेशनमुळे हृदयविकार किंवा कर्करोग टाळता येतो, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. नैसर्गिक उत्पादने पूर्णपणे सुरक्षित असतात असे लोक मानतात. मात्र, अनेक हर्बल आणि नैसर्गिक सप्लिमेंट्सचे शरीरावर प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. व्हिटॅमिन ए आणि डी चे अतिरिक्त प्रमाण शरीरात साठून यकृत, मूत्रपिंड आणि हाडांना नुकसान पोहोचवू शकते. गरजेशिवाय लोहाच्या गोळ्या घेतल्याने पोट खराब होऊ शकते आणि दीर्घकाळात शरीराच्या अवयवांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.


