Gadchiroli: प्रगत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव किती भयावह असू शकते, याचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. गावात साधी प्रसूती सुविधा नसल्यामुळे एका २४ वर्षीय गरोदर मातेला जंगलातून ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. या प्रवासाच्या थकव्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने पोटातील अर्भकासह मातेचाही मृत्यू झाला.
सुरक्षिततेचा शोध ठरला जीवघेणा
आशा संतोष किरंगा (रा. आलदंडी टोला) असे मृत मातेचे नाव आहे. आशा या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. गाव दुर्गम भागात असल्याने आणि तिथे प्रसूतीची सोय नसल्याने, ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून त्यांनी बहिणीच्या गावी (पेठा) जाण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी रोजी त्यांनी पतीसह ६ किलोमीटरचा जंगल प्रवास पायी पार केला. सुरक्षित प्रसूती व्हावी, हाच या पायपिटीमागचा एकमेव उद्देश होता.
उपचारांची धावपळ अन यंत्रणेचे अपयश
दरम्यान, २ जानेवारीच्या रात्री आशा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने हेडरी येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तपासणीअंती बाळ पोटातच दगावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाळाच्या मृत्यूनंतर आशा यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि उपचारादरम्यान त्यांनीही प्राण सोडले.
शवविच्छेदनासाठी वणवण
मृत्यूनंतरही या कुटुंबाची हालअपेष्टा थांबली नाही. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, शवविच्छेदनासाठी मृतदेह पुन्हा ४० किमी लांब अहेरीला हलवावा लागला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गडचिरोलीच्या दुर्गम भागातील महिलांना प्रसूतीसाठी जीव मुठीत धरून जंगलातून चालावे लागते, ही बाब राज्यासाठी लाजीरवाणी ठरत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, ग्रामीण आरोग्य यंत्रणा केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.


