Rajya Sabha Election : राज्यसभेच्या राजकारणात 2026 हे वर्ष मोठ्या घडामोडींचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत. देशपातळीवरही मोठे बदल अपेक्षित असून, यंदा भाजपचे सर्वाधिक 30 खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
2026 मध्ये देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील निवडणुका आणि नव्या सदस्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वर्षात एकूण 71 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यापैकी मार्चमध्ये 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.
राज्यसभेच्या 245 एकूण जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवृत्तीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपत असून, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्याच सुमारास निवृत्त होणार आहेत.
या दिग्गजांचा समावेश?
महाराष्ट्रातून 2 एप्रिल 2026 रोजी एकाच दिवशी सात खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार धैर्यशील मोहन पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या डॉ. फौजिया खान यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशातूनही अनेक महत्त्वाचे नेते राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार असून, त्याचवेळी उत्तर प्रदेशातील आणखी आठ खासदार निवृत्त होतील. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू, जॉर्ज कुरियन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही कार्यकाळ पुढील वर्षी पूर्ण होणार आहे.
याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, गुजरातमधील शक्तीसिंह गोहिल, तेलंगणातील अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, द्रमुकचे तिरुची शिवा आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबी दुराई हेही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ मार्च 2026 मध्ये संपणार आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत कोणते नवे चेहरे संसदेत प्रवेश करणार आणि राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


