Cabinet Meeting: महाराष्ट्रात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 70 लाख एकरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शाळा, घरे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत, तर कॅबिनेट मीटिंग दरम्यान या घटनेवरही चर्चा झाली. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, 31.64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही मदत खरीप 2025 साठी मंजूर करण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात पूर्वी पावसाने हाहाकार घातला होता, तर आता मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार 32 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यावर युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत. काही ठिकाणी अद्यापही पाणी राहिल्यामुळे पंचनामे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. तथापी, पाणी ओसरल्यावर तिथे पंचनामे करण्यात येणार आहेत.
याव्यतिरिक्त, सरकारने नुकसानीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1,339 कोटींची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. ही मदत जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार दिली जाणार आहे. बीड, धाराशिवसह काही भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


