Bogus Voting Election 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे यांसह अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. त्यावरुन, आता विरोधी पक्षातील नेत्यांनी ओरड सुरू केली असून स्थानिक मतदान केंद्रावरील लोकही व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत. त्यातच, पुणे, सोलापूर, मुंबई आणि जालन्यासह काही ठिकाणी बोगस मतदार पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोलापुरात कर्नाटकमधून गाड्या भरुन मतदार आणल्याचा दावा समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.
महादेववाडी उंड्रीत खासगी गाडीतून लोकांना मतदानासाठी आणले
पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः महादेव वाडी उंड्री या परिसरात एका खासगी गाडीतून ग्रामीण भागातून काही लोकांना मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. नाना भानगिरे हे शिवसेना पुणे शहरप्रमुख आहेत, त्यांनी स्वत: प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंड्री या प्रभागातील उंड्री चौक येथे बोगस मतदान पकडले आहे आहेत. तसेच, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
विरारमध्ये मतदाराच्या नावे दुसऱ्याचेच मतदान
विरारमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेश राठोड या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने अगोदरच मतदान केल आहे, असे सांगितले जात आहे. विरारमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही घटना असल्याचे सांगितले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत खुद्द महेश राठोड याच मतदाराने सविस्तर सांगितले आहे. मी मतदान करायला गेलो होतो. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचे मतदान झालेले आहे. मग मी सांगितलं की मी आताच आलो. माझे मतदान कसे झाले.पण ते मला तुमचे मतदान झालेले आहे असे सांगतलं.
जालन्यात बोगस मतदार ताब्यात
जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरामध्ये मधुकर देठे याने बोगस मतदान केल्याचा संशय मतदान प्रतिनिधींनी केला. या संशयावरून संबंधित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयित मतदाराची सध्या पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे, खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांची सांगितल.
कर्नाटकातून गाड्या भरुन आणले मतदार
सोलापुरातील प्रभाग 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमकडून बोगस मतदानासाठी कर्नाटकातून गाड्या आणल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. जवळपास दोन हजार मतदार बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप समाजवादीकडून करण्यात आला. मात्र, हे बोगस मतदार समाजवादी पक्षाकडून पकडल्यानंतर बोगस मतदार माफी मागून निघून गेल्याचा दावाही समाजवादीचे उमेदवार रियाज खरादी यांनी केला आहे.
बोरिवलीत पकडले बोगस वोटर आयडी
बोरिवली प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड यांनी फेक वोटर आयडी पकडले आहेत. भाजपकडून फेक वोटर आयडी वाटले जाऊन मतदानासाठी लोकांना आणले जात आहे, त्याशिवाय भाजपकडून वोटिंग स्लिप दिल्या जात आहेत असा आरोप भगवा गार्ड यांच्याकडून करण्यात आला.


