मुंबई: राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीतील पक्षांची स्थिती जिल्ह्यानुसार बदलताना दिसत आहे. काही ठिकाणी भाजपाने स्वतंत्र लढाईचा मार्ग स्वीकारला आहे, तर काही भागात अनपेक्षित पद्धतीने पक्षांमध्ये नव्या आघाड्या तयार होताना दिसत आहेत. चाकणमध्ये नगराध्यक्षपदाच्या लढतीसाठी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकत्र आली आहे. तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार आणि अजित पवार यांनी हातमिळवणी केली आहे. या बदलत्या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसणाऱ्या युती-आघाड्या हे राज्याच्या किंवा देशाच्या मोठ्या राजकारणाचं प्रतिबिंब असतंच असं नाही. गावागावांत दशकांपासून चालत आलेली गटबाजी असते. कधी मित्रपक्ष असले तरी स्थानिक पातळीवर त्या नेत्यांत टोकाची वैरभावना असू शकते. अशा परिस्थितीत ते स्वतंत्रपणे मैदानात उतरतात. हे प्रत्येक पक्षाला लागू होतं. ग्रामपातळीवर काही ठिकाणी पक्ष वेगळा लढतो, काही ठिकाणी स्थानिक नेते एकत्र येतात. याला अतिशय गंभीरपणे पाहण्याचं कारण नाही. गावात कोणत्या व्यक्तीसोबत राहिल्याने आपला फायदा होईल, हे स्थानिक नेत्यांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे तिथे वेगळ्या पद्धतीची आघाडी तयार होणं स्वाभाविक आहे.”
दरम्यान, कोकणात शिवसेना (शिंदे) आणि भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. नागपूरमध्येही जवळपास हेच चित्र दिसत आहे. भंडारा–गोंदियामध्ये तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पूर्णत: स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र चाकणमध्ये या सर्वांपेक्षा वेगळी घडामोड झाली असून ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांनी एकत्र मंचावर येत स्थानिक वाद बाजूला ठेवले आहेत.
चाकण नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांनी 16 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करताना दोन्ही शिवसेना गटांचे आमदार उबाठा गटाचे बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे शरद सोनावणे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.


