Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीएने प्रभावी कामगिरी करत प्रचंड बहुमत मिळवले असून, तब्बल 202 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे, महागठबंधन केवळ 35 जागांवर सीमित राहिल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक नेते आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपले मत व्यक्त केले.
शरद पवार यांनी बिहारमधील निकालांवर बोलताना आरोप केला की, राज्यातील महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 10 हजारांच्या आर्थिक मदत योजनेचा हा थेट परिणाम आहे. “एवढ्या प्रमाणात आर्थिक लाभ वाटप करून निवडणुकीवर प्रभाव टाकणे योग्य आहे का? याचा विचार केला पाहिजे,” अशी टीका करत त्यांनी निवडणूक आयोगाने सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.
फडणवीसांचे प्रत्युत्तर: “जो जीता वही सिकंदर”
शरद पवारांच्या आरोपांना थेट उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जो जीता वही सिकंदर. पराभवानंतर पराभव स्वीकारण्याची कुवत असली पाहिजे. आत्मचिंतन करायला हवे, चुका मान्य करायला हव्यात. पण विरोधकांना हे मान्य नाही.” ते पुढे म्हणाले, “तुमचं सरकार असताना तुम्ही अशा योजना का नाही राबवल्या? आम्ही जे उपक्रम सुरू केले, ते लोकांनी पसंत केले म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. मग त्यात लोकांचा दोष कसा?”
शरद पवार यांनी मतदानानंतर स्थानिकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत सांगितले की, बिहारमध्ये महिलांचे मतदान विशेषतः जास्त प्रमाणात झाले होते आणि ते दहा हजारांच्या आर्थिक मदतीच्या योजनेशी संबंधित असू शकते. तसेच ते म्हणाले, महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. जर पुढेही कोणत्याही राज्यात सत्ताधारी निवडणुकीच्या आधी सरकारी योजनांच्या नावाखाली पैशांचा मोठ्या प्रमाणावर वाटप करत राहिले, तर लोकांच्या निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाला तडा जाईल.


