पुणे: आठवडाभरापासून मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव, बीड, लातूरसह अनेक गावांना पाण्याचा वेढा घालण्यात आला आहे, तर नद्यानाल्यांचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. पिकांची बिघडलेली स्थिती आणि घरांमध्ये पाण्याचा प्रवेश यामुळे शेतकरी व स्थानिक लोक मोठ्या संकटात आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई-पुण्यात राहणाऱ्या मराठी कलावंतांना मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, ‘सोनू सूद जसा पंजाबमधील संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे धावला, त्याचप्रमाणे आपण निदान फुलाच्या पाकळी इतकी मदत तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना करावी. या मराठवाड्याने आपल्याला फाळके पुरस्कारापासून महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे.’
मिटकरी म्हणाले की, सध्या पूरग्रस्त भागात अन्नधान्य, औषधे, कपडे, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी लोक त्रस्त आहेत. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे पुण्या-मुंबईत राहणाऱ्या कलावंतांनी पुढे येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं भावनिक आवाहनही मिटकरींनी केलं आहे.
सर्व मराठी कलावंत ,पुण्या मुंबईत राहणारे सिनेअभिनेते,गायक ,शाहीर, याना विनंती सोनु सुद जसा पंजाबच्या मदतीला धावला तितक नाही पण निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवाना मदत करा.याच मराठवाड्याने आपल्याला फाळके ते महाराष्ट्र भुषण पर्यंत पोहचविले आहे 🙏
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 27, 2025
मराठवाड्यातील या महापूरामुळे नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापी, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील कलावंतांनी मदतीचा हात पुढे वाढवणे आवश्यक आहे. अमोल मिटकरींच्या आवाहनाने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीची आशा निर्माण झाली असून, कलावंतांचा सहभाग संकटाविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


