Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स’मध्ये थाटामाटात पार पडला. भव्य सजावट, मोठा ताफा, ओपन जीपमधील मुलीची एन्ट्री, खास डिझायनर पेहराव या सर्व गोष्टींमुळे सोहळा सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण या सोहळ्यावर झालेला मोठा खर्च आणि पोशाखावर झालेल्या टीकेमुळे आता इंदुरीकर महाराज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण, कीर्तनांत ते नेहमी साध्या पद्धतीने विवाह करण्याचा उपदेश करीत आले आहेत.
टीकेवर इंदुरीकर महाराजांचा संताप
साखरपुड्यानंतर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना इंदुरीकर महाराजांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मला आधीच माहिती होतं की काही लोक औलादीसारखे माझ्यामागे लागणार आहेत. मी स्पष्ट सांगतो लग्नाचा सोहळा याहूनही मोठा करणार आहे, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. माझ्या कुटुंबावर वार करणं थांबवावं. मी तीस वर्षे टीका सहन केली, पण आता माझ्या घरावर आल्यानंतर मी गप्प बसणार नाही.’
हेही वाचा – माझ्या मुलीच्या कपड्यावर कशाला बोलता? इंदुरीकर महाराजांचा संतप्त सवाल
एवढेच नव्हे तर त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचाही विचार सुरू असल्याचे संकेत दिले. माझ्यापर्यंत टीका चालते, पण माझ्या मुलामुलींपर्यंत आली, तर मी विचार करायलाच हवा. म्हणूनच फेटा खाली ठेवण्याचा विचार करतो आहे, असे ते म्हणाले. या साखरपुडा सोहळ्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. इंदुरीकर महाराजांच्या संपर्कामुळे राज्यभरातून 2000 पेक्षा अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उपदेश आणि प्रत्यक्ष कृती
इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून नेहमी साधेपणाचा संदेश दिलेला असतानाच मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंचा खर्च केल्याने सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमातील शोभा, गाड्यांचा काफिला आणि खर्चीक तयारीमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाटिप्पणी होत आहे.


